महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले ‘आता थेट…’

राज्यात सध्या मनसे-शिवसेनेच्या युतीची चर्चा रंगली आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीसाठी आपण तयार असल्याचं सांगितल्यानंतर या चर्चांना सुरुवात झाली होती. यानंतर आता दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्तेही युतीसाठी अनुकूल असल्याचं सांगत आहेत. यादरम्यान आता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर मोठं विधान केलं आहे. जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईलच असं सांगत त्यांनी एकाप्रकारे युतीला हिरवा सिग्नलच दिला आहे.
मातोश्रीवर चारकोपमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाही सुजाता शिंगाडे यांचा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांना राज ठाकरे-उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार यासंदर्भात विचारणा करण्यात आली. तसंच मनसेने तुम्ही आधी युतीचा प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केल्याचं विचारलं असता ते म्हणाले, “जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल”. इतर बारकावे आम्ही पाहतो असं सांगत त्यांनी यापेक्षा जास्त भाष्य करण्यास नकार दिला.
“मी संदेश नाही, बातमीच देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यांचेही मनसैनिक आमच्या संपर्कात आहे. त्यांच्याही मनातही संभ्रम नाही. त्यामुळे संदेश देण्यापेक्षा बातमीच देईन,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
सुरूवातीला युतीसाठी राज ठाकरेंनी दिलेल्या टाळीला उद्धव ठाकरेंनी देखील हात दिला होता. दरम्यान यानंतर संजय राऊतांनी युतीच्या चर्चांना खंड न पडू देता हा मुद्दा लावूनच ठरला. ठाकरेंची शिवसेना युतीसाठी सकारात्मक असल्याचं राऊतांनी वारंवार सांगितलं. तर सकारात्मक असून काही होत नाही प्रस्ताव कुठे आहे असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी उपस्थित केला.
राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर मनसेची स्थापना केली. सुरुवातीला महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या मनसेला चांगलं यश मिळालं. मात्र, कालांतरानं राज ठाकरेंच्या मनसेला उतरती कळा लागली. तिकडे शिवसेना भाजपसोबत सत्ता भोगतच राहिली. मात्र, 2019 विधानसभेनंतर आणि एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला देखील मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दोन्ही पक्षाला बुस्टर मिळणार अशी चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्नच आहेच.. मात्र, दुसरीकडे महायुतीची देखील राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे.. त्यामुळे महायुतीची रणनीती ठाकरे बंधूंच्या युतीचा डाव हाणून पाडणार का? की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.