
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकले. जेतेपद जिंकल्यानंतर आरसीबी त्यांच्या होमग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर जल्लोष करण्यासाठी आला. पण येथे चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आणि 47 जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून, संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र या घटनेचं राजकारण आणि दोषारोप आता चिघळायला लागले आहेत.
बीसीसीआय आणि आयपीएल प्रशासनाने या संपूर्ण घटनेपासून स्वत:ला अलिप्त ठेवलं असून, हात झटकले आहेत. खरंतर, बंगळुरुतील पोलीस दल व इव्हेंट मॅनेजमेंट यंत्रणा अपयशी ठरल्याचं स्पष्ट असून आले. पण अनेक बड्या अधिकार्यांनी अप्रत्यक्षपणे विराटच्या चाहत्यांच्या जबाबदार धरलं आहे. दरम्यान, या घटनेवर आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल त्यांनी या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “आम्हाला ही परिस्थिती कळताच आम्ही ताबडतोब आयोजकांशी बोललो. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की ते समारंभ लवकर संपवतील. ही घटना खूप दुःखद आणि दुर्दैवी आहे.” ते पुढे म्हणाले की, “आरसीबी अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या लोकांना बाहेरील परिस्थितीची माहिती नव्हती”
बीसीसीआयला जबाबदार धरता येणार नाही – अरुण धुमल
त्यांनी पुढे स्पष्ट केले की यासाठी बीसीसीआय जबाबदार नाही. धुमल यांनी इंडिया टुडेला सांगितले की, ‘हे दुःखद आणि वेदनादायक आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल आमच्या मनापासून संवेदना आहेत. बीसीसीआयसाठी आयपीएल काल रात्री संपली. आम्हाला अशा कोणत्याही घटनेची कोणतीही माहिती नव्हती, मग आम्हाला त्यासाठी कसे जबाबदार धरता येईल?’
धूमल शेवटी म्हणाले की, “अशा घटनेसाठी आम्हाला कसे जबाबदार धरता येईल? ही खरोखरच एक अतिशय दुःखद घटना आहे आणि आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो. परंतु ज्यावर आमचे नियंत्रण नव्हते अशा गोष्टीसाठी आम्हाला जबाबदार धरता येणार नाही. चेंगराचेंगरी स्टेडियमच्या बाहेर झाली की नाही याची मला खात्री नाही. मला याबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती नाही. तुम्ही गेटवर उपस्थित असलेला आयपीएलचा कोणताही अधिकारी पाहिला आहे का, जो गर्दी हाताळत आहे किंवा खेळाडूंना प्रवेश मिळवून देत आहे.’