
आरसीबीने 18 वर्षांनंतर आयपीएलचं जेतेपद जिंकलं असतानाच या विजयाला गालबोट लागलं आहे. चिन्नास्वामी स्टेडिअमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच 25 जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला आहे. स्टेडिअमबाहेर तणाव असतानाच मैदानात मात्र खेळाडूंचा सत्कार सोहळा सुरु आहे.
आयपीएल 2025 मधील ऐतिहासिक विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे सर्व खेळाडू बंगळुरुत दाखल झाले. बंगळुरुत त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये खेळाडूंचा भव्य सत्कार करण्यात आला. मात्र त्याआधीच सेलिब्रेशनला गालबोट लागलं. चिन्नास्वामी मैदानाबाहेर झालेल्या तुफान गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. पोलिसांनी यावेळी चाहत्यांवर लाठीचार्जही केला.
ओपन बस परेडला दिला होता नकार
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघ तब्बल 18 वर्षांनी आयपीएल जिंकला आहे, आपला हा विजय साजरा करण्यासाठी आरबीसीने शहरातून ओपन बस परेड काढण्याची योजना आखली होती. मात्र पोलिसांनी यासाठी नकार दिला होता. बंगळुरुमधील वाहतूक कोंडीमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. 4 जून रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास हा कार्यक्रम सुरु होणार होता. विधान सौधा येथून सुरू होऊन बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ही परेड संपणार होती.
नियोजित कार्यक्रमानुसार सायंकाळी 5 ते 6 च्या सुमारास हा सत्कार कार्यक्रम पार पडणार होता. वैध पास असलेल्यांनाच कार्यक्रमस्थळी प्रवेश मर्यादित असणार होता. स्टेडिअमभोवती मर्यादित पार्किंग उपलब्ध असल्याने उपस्थितांना मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र लोकांनी तुफान गर्दी केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली.
सामन्यात काय झालं?
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने 20 षटकांत 9 गडी गमावून 190 धावा केल्या. संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक 43 धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंग आणि काइल जेमिसन यांनी 3-3 विकेट्स घेतल्या. पंजाबच्या फलंदाजांनी अथक प्रयत्न केले, पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. शशांक सिंगने 30 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. त्याने 3 चौकार आणि 6 षटकार मारले. जोश इंग्लिशने 23 चेंडूत 39 धावा केल्या. प्रभसिमरन सिंगने 36 आणि प्रियांश आर्यने 24 धावा केल्या. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पंड्याने 2-2 विकेट्स घेतल्या. बंगळुरुने सहा धावांनी हा सामना जिंकला.