देश

साताऱ्याला चार दिवसांसाठी ऑरेंज अ‍ॅलर्ट, कोयना धरणातील पाणी साठा वाढला, नदीत पाण्याचा विसर्ग होणार, मोठी अपडेट

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात कोयनानगरला १५०, नवजाला २०१, तर महाबळेश्वरला १८५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात प्रति सेकंद ५९ हजार ८५१ क्युसेक पाण्याची आवक सुरू असून पाणीसाठा चोवीस तासात चार टीएमसीने वाढला आहे. १०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा ५१.९३ टीएमसी झाला असून ४९.३३ टक्के भरले आहे. तर धोम बलकवडी धरण क्षेत्रात पावसाचा जोर आहे. त्यामुळे धरणातून कालपासून सुरू असलेला प्रतिसेकंद २०२० क्युसेक विसर्ग वाढवून २२९८ क्युसेकपर्यंत केला आहे. सातारा जिल्ह्यात पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

गतवर्षी २०२२ला आजच्या दिवशी कोयना धरणात ६२.७० टीएमसी पाणीसाठा होता. तर धरण ५९.५७ टक्के भरले होते. तर २०२१ रोजी आजच्या दिवशी धरणात ८७.४६ टीएमसी पाणीसाठा होता, तर धरण ८३.०९ भरले होते.

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, पाटणसह सातारा, कराड, जावली तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कृष्णा, कोयना, उरमोडी, वेण्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. दरडप्रवण गावांमधील नागरिकांमध्ये संततधार पावसामुळे भीतीचे वातावरण आहे. तेथील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यंत्रणा उभारली असून त्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

कोयना धरणातून होणार १०५० क्युसेक विसर्ग

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. धरणात आवक वाढली आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून आज सोमवारी दुपारी चार वाजता १०५० क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे. तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून ग्रामस्थांनी नदी पात्रात जावू नये. तसेच त्यांनी जनावरे नदी पात्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button