देश

महाराष्ट्र भूषण सोहळ्यात मृत्यूचं तांडव; नागपूरची सभा आटोपून उद्धव ठाकरे, अजितदादा थेट रुग्णालयातच पोहोचले

ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यासाठी खारघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याला गालबोट लागले होते. या सोहळ्यात उष्माघातामुळे धर्माधिकारी यांच्या ११ अनुयायांचा उष्माघाताने मृत्यू झाला. हा सगळा प्रकार घडत असताना नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा सुरु होती. मात्र, नवी मुंबईत इतकी मोठी दुर्घटना घडली आहे हे कळाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे ही सभा आटोपून थेट कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल झाले. उद्धव ठाकरे आणि अजित पवार जवळपास मध्यरात्री रुग्णालयात पोहोचले. यानंतर दोघांनीही जखमींची विचारपूस केली आणि डॉक्टरांकडून परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर दोघांनीही महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील ढिसाळ नियोजनावर ताशेरे ओढले. उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमासाठी ठरवण्यात आलेल्या वेळेबद्दल प्रश्न उपस्थित केले. कार्यक्रमाची चुकीची वेळ कोणी दिली? ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला गालबोट लागले. सरकार या घटनेची चौकशी करेल की नाही माहिती नाही. पण, अमित शाहांना दौऱ्यासाठी जायचं असल्याने हा कार्यक्रम भर दुपारी घेतला असेल, तर याची चौकशी कोण करणार? या घटनेत निरपराध जीव गेले आहेत. उष्माघातामुळे या ११ श्रीसेवकांचा मृत्यू झाला. अमित शाहांना वेळ नसल्याने जर हा कार्यक्रम दुपारी ठेवला असेल, तर हा दुर्दैवी प्रकार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

हलगर्जीपणामुळे महाराष्ट्र भूषण सोहळ्याला काळा डाग लागला; अजित पवारांची टीका

महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार राज्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्याच्या निर्णयावर सर्वचजण समाधानी होते. पण एखाद्या कार्यक्रमात हलगर्जीपणा झाल्यावर काय घडू शकतं, हे काल समजलं. त्यामुळे महाराष्ट्र भूषणसारख्या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला काळा डाग लागला. अजूनही किती लोकं मृत्यूमुखी पडली, हा आकडा समोर येत नाही. करोनाच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही कधीही मृतांचा आकडा लपवायचे नाहीत, त्यांनी तशा सूचना दिल्या होत्या. अनेक एमजीएम पनवेल, एमजीएम वाशी, टाटा आणि डीवायएम रुग्णालयातही रुग्ण आहेत. या सोहळ्यात नेमके कितीजण जखमी झाले आहेत, याबाबत ठोस माहिती नाही, याकडेही अजित पवार यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्र भूषण सोहळ्यात ११ जणांचा मृत्यू झाल्याने सरकारच्या ढिसाळ नियोजनावर अनेकजण टीका करत आहेत. उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी जखमींची भेट घेतल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे हेदेखील एमजीएम रुग्णालयात जाणार आहेत. सोमवारी ११ वाजता ते एमजीएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करतील. यानंतर राज ठाकरे काय बोलतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Related Articles

Back to top button