Prithvi shaw Ranji Trophy final: मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात मुंबईचा संघ पिछाडीवर असून मध्य प्रदेश विजयाच्या जवळ आहे, पण मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने सर्वांची मनं जिंकली आहेत. सामन्याच्या चौथ्या दिवशी शॉने मैदानावरील कर्मचाऱ्यांना मदत करून सर्व क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आणि मैदानात बसलेल्या प्रेक्षकांनीही त्याचे कौतुक केले.
सामन्याच्या चौथ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबवण्यात आला होता. अशा परिस्थितीत मैदानावरील कर्मचारी खेळपट्टीला भिजण्यापासून वाचवण्यासाठी कव्हर आणत होते. दरम्यान, पृथ्वी शॉनेही फील्ड कामगारांना मदत करण्यास सुरुवात केली. त्याने कव्हर ओढण्यास मदत केली. हे पाहून स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. आता शॉचे कव्हर ओढतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पृथ्वी शॉने अंतिम सामन्यात चांगली फलंदाजी केली आणि दोन्ही डावात चांगली सुरुवात केली, मात्र त्याला त्याचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. पहिल्या डावात त्याने ४७ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्याच्या बॅटमधून ४४ धावा झाल्या. मात्र, सर्फराज खानने पहिल्या डावात शतक झळकावून मुंबईला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ३७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशने ५३६ धावांची मोठी मजल मारली. मध्य प्रदेशकडून यश दुबेने १३३, शुभम शर्माने ११६ आणि रजत पाटीदारने १२२ धावा केल्या. शेवटी सरांश जैननेही ५७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.