पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यावर शिक्कामोर्तब, कलाकारांचा तीव्र विरोध

पुण्याचं वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. ५४ वर्षांपूर्वी पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून हे रंगमंदिर उभे राहिले. २०१८ साली मुरलीधर मोहोळ स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाची संकल्पना मांडली आणि अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूदही केली. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षांच्या कालावधीत हा विषय बाजूला राहिला होता. रंगमंदिर पाडण्यास काहींनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे पुनर्विकासासाठी महापालिका स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आणि अखेर बालगंधर्व पाडण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून याला कलाकारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
बालगंधर्व पाडण्यास कलाकारांचा विरोध
२०१८ मध्ये जेव्हापासून हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, तेव्हापासून आम्ही याला विरोध करत आहोत. राजकारणी मंडळी हे राजकीय स्वार्थासाठी एकत्र आले आहे. पण, आम्ही याला विरोध करणार आहो. आज पुणे शहरात एकूण १४ नाट्यगृह असून शहरात फक्त ३ नाट्यगृहच सुरू आहेत. तर काही श्रेयवादावरून राजकारण सुरू असल्याने नाट्यगृह बंद आहे. असाच प्रकार या बालगंधर्व नाट्यगृह मंदिराबाबत होणार आहे आणि अजूनही यासारखी वास्तू कुठेही नाही. त्यामुळे ही वास्तू पाडू नये, असं म्हणत काही कलाकार तसेच सामान्य नागरिकांनी मतं व्यक्त केली आहेत.
असं असणारं नवीन बालगंधर्व
सध्याचे बालगंधर्व रंगमंदिर साडेबावीस हजार चौरस फूट जागेवर असून मूळ वास्तू पाडून साडेतीन लाख चौरस फुटांचे रंगमंदिर बांधण्यात येणार आहे. नव्या वास्तूत ८०० ते ९०० दुचाकी आणि ३५० चारचाकी वाहनांची पार्पिंग व्यवस्था असेल. एक हजार, पाचशे आणि तीनशे अशा आसनक्षमतेची तीन नाट्य़गृहे असणार आहे.