महाराष्ट्रातील एकमेव स्मारक ज्याचं काम 40 वर्षांपासून रखडलयं; राज्यकर्त्यांकडून शंभूराजांच्या स्मारकाची अवहेलना

संगमेश्वरला फार मोठे ऐतिहासिक महत्व प्राप्त आहे. शिल्पकलेचा अद्वितीय आविष्कार असलेली पुरातन मंदीरे, गड – किल्ले आणि ब्रिटिश कालीन वास्तू याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे या भागात असणारे वास्तव्य यामुळे देश विदेशातील पर्यटक संगमेश्वरला भेट देत असतात. छत्रपती संभाजी राजांना कसबा – संगमेश्वर येथे दगाबाजीने पकडल्यामुळे त्यांची आठवण म्हणून त्यांचे स्मारक उभारण्याची योजना आखण्यात आली. 11 मार्च 1986 साली संगमेश्वर जाखमाता मंदीराजवळ भव्यदिव्य असा स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. हा सोहळा आणि उपस्थित मान्यवरां मधील उत्साह पाहून प्रत्येक संभाजी प्रेमीला असे वाटले की , हे स्मारक एक ते दोन वर्षात पूर्णत्वास जाईल.
इतिहासातील काही गोष्टी जशा शापित आहेत तसेच या स्मारकाच्या बाबतीत घडणार आहे याची संभाजी प्रेमींना काय कल्पना ? स्मारकाच्या उभारणीची सुरुवात जोमाने झाली मात्र त्यानंतर सुरु झालेले स्मारकाच्या दुर्दैवाचे फेरे आज 29 वर्षात 80 लाख रुपये खर्च होवूनही कायम आहेत. हे स्मारक पूर्ण होवून कार्यरत होण्यासाठी अनेक आंदोलने , विनंत्या आणि बैठका घेण्यात आल्या. अनेक संघटना आणि मान्यवरांनी भेटी देवून गर्भित इशारेही दिले, मात्र यातील एकाही चळवळीचा परिणाम कोणावर झाला नाही. बांधकाम विभागाने निकृष्ट पध्दतीने काम झालेले स्मारक हस्तांतरित करुन पुढील जबाबदारी स्मारक समितीवर सोपवली. स्मारक समितीकडे कोणताही ठोस कार्यक्रम नसल्याने हे स्मारक गेल्या पाच वर्षात कार्यरत होवू शकलेले नाही.
सद्यस्थितीत स्मारकाला जाळ्या आणि वेलींनी पूर्णपणे वेढले आहे. दरवाजे मोडले असून , काचा फोडण्यात आलेल्या आहेत , पायऱ्या मोडल्या असून स्ट्रीट लाईट फोडून टाकण्यात आलेत. सुरक्षा रक्षकासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीची पूर्णतः दुरवस्था झाली असून याचे दरवाजे मोडून यामध्ये गैरप्रकार केले जात आहेत. स्मारकाचे गेट मोडले असून सध्या या स्मारकाचा वापर एक ‘ आडोसा ‘ म्हणून केला जात असल्याचे पाहायला मिळतेय. स्मारकात सध्या मद्यपी मंडळींचे कायम स्वरुपी वास्तव्य असल्याचे तेथे असलेल्या सामानावरुन स्पष्ट होत आहे.
छत्रपती संभाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. या अस्मितेच्या नशीबी अपूर्ण स्मारकाच्या रुपाने आलेले दुर्दैव हे सहन करण्यापलिकडील आहे . व्यक्तीश: मी या स्मारकाची स्वखर्चाने अनेकदा साफसफाई केली , येथे बलिदान दिनही साजरा केला मात्र आता स्मारक हे समितीच्या ताब्यात असल्याने देखभालीची जबाबदारी त्यांच्यावर आहे. स्मारक समितीच्या दुर्लक्षामुळे आज स्मारक अखेरच्या घटका मोजत आहे. स्मारकाची झालेली दुरावस्था आणि येथे होणारे गैरव्यवहार लक्षात घेता समितीने आमची अस्मिता असणाऱ्या संभाजी राजांचे स्मारकाला दिलेलं नांव बदलावं आणि ही इमारत सरकार जमा करावी अशी मागणी संभाजी प्रेमी परशुराम पवार यांनी केली आहे.