देश

मान्सूनची अतिघाई, साऱ्यांनाच संकटात नेई; विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, उर्वरित राज्यात मात्र तापमानवाढ

यंदाच्या वर्षी मान्सूननं वेळेच्या आधीच अंदमान निकोबार बेटांवर धडक दिवी, यानंतर केरळ आणि पुढे तळकोकणमार्गे महाराष्ट्रातही मान्सून वेळेआधीच दाखल झाला. मात्र आगमानासाठी झालेली मान्सूनची ही घाई आता मात्र काहीशी चिंता वाढवत आहे. कारण, दमदार प्रवेशांनंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळं मुंबई, कोकणासह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. 

महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून सध्याच्या घडीला एकाच जागी स्थिरावला असून, अद्यापही या वाऱ्यांनी पूर्ण राज्य व्यापलेलं नाही. राज्यात विदर्भातील काही भागांमध्ये मान्सूननं अद्यापही हजेरी लावलेली नाही, तर मराठवाड्यातील जिल्ह्यांना मोसमी पावसासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे, त्यामुळं आता मान्सूनची ही मोठी सुट्टी शेतकरी वर्गाच्याही चिंतेत भर टाकताना दिसत आहे. 

सातत्यानं बदलणाऱ्या या हवामानामुळं पुढील 24 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र, विदर्भाचा काही भाग आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि उष्णतेचा दाह कायम राहणार आहे. दरम्यानच्या काळात राज्याच्या किनारपट्टी भागांमध्ये हवेत आर्द्रतेचं प्रमाण अधिक राहणार असून, उकाडा बेजार करण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता हे मोसमी वारे सुट्टी संपवून कधी एकदा पूर्ण ताकदीनं बरसतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

कुठवर पोहोचला आहे मान्सून? 

विश्रांती घेण्यापूर्वी मोसमी वाऱ्यांनी मुंबई, अहिल्यानगर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांपर्यंत मजल मारली होती. मे महिना संपण्यााधीच या भागांमध्ये मान्सून पोहोचला. मात्र समुद्रामध्ये निर्माण होणारा कमी दाबाचा पट्टा आणि वाऱ्यांच्या वेगासह त्यांची दिशा पाहता मान्सूनच्या वेगावर याचा परिणाम होऊन पावसाचा प्रवास मंदावला. ज्यामुळं किमान पुढील पाच दिवस तरी मान्सून हवा तसा बरसणार नाही असाच प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

कोकणात मान्सूनची अपेक्षेपेक्षा जास्त हजेरी 

यंदा जून महिन्यात महाराष्ट्रात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी, मे महिन्यातच संपूर्ण राज्यात पावसाने लावलेली दमदार हजेरी पाहता हे प्रमाण अपेक्षापेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यात सार्वाधिक पावसाची नोंद झाली. 1 ते 31 मे दरम्यानच्या कालावधीत सिंधुदुर्गात 564.7 मिमी पावसाची नोंद झाली. तर, राज्यात सरासरी 173 मिमी पावसाची नोंद झाली.

Related Articles

Back to top button