नाव घ्याल तिथं पाऊस! देशातील 21 राज्यांमध्ये मुसळधार, समुद्रात 7 मजली इमारतीइतक्या लाटा

देशाच्या उत्तरेपासून ते अगदी दक्षिणेपर्यंत हवामानाच्या स्थितीवर नजर टाकल्यास पावसानं बहुतांश राज्य व्यापल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच नव्यानं सक्रिय असणाऱ्या एका पश्चिमी झंझावातामुळं दिल्ली, हरियाणामध्येही पावसानं हजेरी लावली, तर तिथं अतीव उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्येसुद्धा पावसाचा मारा आणि थंडीचा कहर असंच वातावरण दिसून आलं.
देशभरात मान्सूनचाही प्रभाव दिसण्यास सुरुवात…
नैऋत्य मोसमी वारे केरळमार्गानं महाराष्ट्रात पोहोचले असून, या वाऱ्यांचा परिणाम दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेशापर्यंत दिसत आहे. केरळमध्ये सर्वत्र पावसानं दोरदार हजेरी लावली असून, दिल्लीमध्ये तर काही ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटनासुद्धा घडल्या. आयएमडीच्या वृत्तानुसार सोमवारी देशात्या 9 राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आणि हे वारे तिथं स्थिरावतानाही दिसले.
सध्याच्या घडीला मान्सून वाऱ्यांचा प्रवास सुरू असल्यामुळं देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी आहे.तर, 21 राज्यांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यंदाच्या वर्षी मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग अपेक्षेहून अधिक असल्यानं 24 मे रोजी केरळमध्ये दाखल झाल्यानंतर हे वारे पुढच्या दिवशी 25 मे पर्यंत गोवा, मिझोरम, नागालँड आणि महाराष्ट्रापर्यंतही दाखल झाले. पुढे या वाऱ्यांनी केरळचा उर्वरित भाग, कर्नाटक, गोव्याचा उर्वरित भाग, मेघालय, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा इथपर्यंत मजल मारली.
ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्येसुद्धा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे परिणाम दिसत असून, येथील समुद्रामध्ये 7 ते 10 मजली इमारतीइतक्या इंच लाटा उसळत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांमध्ये केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं पश्चिम बंगालमध्ये पावसाचा जोर वाढेल असा इशारा जारी करत कर्नाटकच्या सीमाभागातही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, केरळच्या किनारपट्टी भागांमध्ये समुद्र खवळलेला असल्यानं आपात्कालिन यंत्रणासुद्धा इथं सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे.
यंदाच्या वर्षी मान्सूननं आगमनाच्याच सत्रामध्ये बहुतांश राज्यांना झोडपलं असून, डोंगराळ भागांमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलनाची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ज्यामुळं नागरिकांनासुद्धा सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागासह विविध राज्यांच्या प्रशासकीय यंत्रणेनं जारी केला आहे.